भुताची शिकार
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiQwJaBraLNM-BDBFlZDZbpNBP7izvhdnr58WIN_Ke_nVEbk9SNybhb-plzjGX9RCSOeY2l3p8GJB4w4iXmLepRYlmCuHI2vHi5EZEoD7ee2zr34Pq2pMgMdpDFYulWc-y4ef2FDwVz1KE/s1600/download+%25281%2529.jpg)
नव्वदच्या दशकाआधी कोकणातल्या वाड्या-वाड्यात, झाडा-पेडावर बर्याच संख्येनं भुता-खोतांचं राज्य होतं. गावची सीमा, गावचा सडा, गावची पांदळ, गावातली झाडून सगळी वडाची झाडं, पिंपळ, वाघबिळं, देवाधर्माची-भूतम्हारक्याची ठिकाणं, स्मशानं, चिंचेंची झाडं अगदी गावच्या कोपर्या कोपर्यानं गावागावातून भुतं सुखासमाधानानं नांदत होती. टिव्ही, मोबाईल फारसा नसलेल्या त्या काळात भुतांच्या गप्पा अतिशय चवीनं रंगत. कधी शाळेतल्या वर्गात.. कधी शेताच्या बांधावर.. कधी रात्रीच्या जेवणानंतर.. गप्पा जशा रंगत तशा त्या अधिक भयावह होत जात. त्यातही गंमत म्हणजे कालच्या रात्रीतल्या गोष्टीत भूत पांढर्या साडीतलं असेल तर लगेच दुसर्या रात्री त्याच गोष्टीत त्याच भुताला उलटे पाय फुटलेले असायचे..! नव्वदच्या दशकानंतर कोकणातली भूतं फारच कमी होऊ लागली आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे भीती कमी होऊ लागली. ही भीती कमी होण्यासाठी गाववाड्यातून बरेच बदल व्हावे लागले. पुर्वी गावात भुतांचे वसतीस्थान असणारे वटवृक्ष वृक्षतोडीमुळे संपले. गावात तेव्हा वीजही नव्हती. अख्खी रात्र रॉकेलच्या दिव्यावर घालवावी लागे. आता मात्र घराघरातून दिवे लागलेच.