राधा हीे मथुरे बाजारा चालली...!

कोकणचा सांस्कृतिक आढावा घेताना त्याची सुरूवात रत्नागिरीतल्या ‘नमन-खेळे, जाखडी’ या लोककलांपासून करावी लागेल. किंबहूना नमन-खेळे हीच रत्नागिरीची खरी सांस्कृतिक ओळख आहे. आज मनोरंजनाची शेकडो साधनं आज हजर झाली असली तरीही या दोन्ही लोककला पुर्वीइतक्याच आजही ताज्या फडफडीत आहेत. पुर्वीइतकीच त्यांना आजही लोकप्रियता लाभते आहे. शिमगा जवळ आला की संकासूर, नटवा, गोमू, रावण अशी लाकडी सोंग आणि मथुरेला जाणारी गौळण पहायला आजही गावागावांतून तुंबळ गर्दी होते. आता तर नमनाचे व्यवसायिक प्रयोगही होवू लागले आहे. 


आता नाटकातही स्त्रिया भूमिका साकारू लागल्या. पण नमन- दशावतारात मात्र आजही पुरूषच स्त्री भूमिका साकारतात. यातच या कलेचं वेगळेपण टिकून राहिले आहे. लोकांना काय आवडतं याची नाडी नमन- खेळ्यांनी अगदी अचूक ओळखली आहे, त्यामुळेच नव्या चित्रपटातील उडत्या गाण्यांचा प्रभाव पहायला मिळेल. आणि म्हणूनच दिवसेंदिवस ही लोककला नवं रूप घेत आहे. इतके परिवर्तन अन्य कुठल्या लोककलेनं स्विकारले नसेल. या परिवर्तन स्विकारण्याच्या वृत्तीमुळेच आज ही लोककला बर्‍यापैकी टिकून आहे. अशाच या नमन खेळ्यातील ‘खास गौळण’ तुमच्यासमोर सादर करीत आहे...
‘अवघड यमुनेचा घाट गं..
चला चढूया मथुरेची वाट गं..
सार्‍या मिळोनी शृंगार केला..
जावू चला मथुरेला..
कंसाच्या नगराला..’ 

अश्शी गोकुळनगरीतील पार्श्वभूमी. गाण्यांचे शब्दही हेच. मात्र त्यांना लावलेल्या चाली चित्रपटातील उडत्या चालीच्या गाण्यांच्या. यामुळेच रसिकांच्या रसिकतेचा ठाव घेणारी नमन-खेळ्यातील ‘गौळण’ आत सर्वत्रच लोकप्रिय होवू लागली आहे. मथुरेच्या बाजाराला निघालेल्या गौळणींचा व  थाटमाठाचा बाज तसाच ठेवून गौळणींना दिलेली आधुनिकतेची जोड यामुळे नमनातील गवळण सध्या रसिकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. फिरत्या (भोवतीच्या) खेळ्यातील गोमू कुठे आणि आताच्या आधुनिक नमनातील ‘राधा’ कुठे? यांचा ताळमेळ जमणारच नाही, पण हल्लीच्या राधेचा शृंगार, अभिनय, नाचणं, गाणं यामुळे ही राधा प्रेक्षकांमध्ये भाव खाल्याशिवाय राहत नाही.
लावणीत ओरीजनल स्त्री नाचते. नाटकांत पूर्वी बालगंधर्वांसारखे कलाकार स्त्री भूमिका साकारायचे. मात्र काळ बदलला तरी कोकणच्या ‘खेळे’ आणि सिंधुदुर्गाच्या ‘दशावतारा’त आजही पुरूषच भूमिका करतात.
खेळांत नेटके दशावतारी।
तेथे येती सुंदर नारी॥
नेत्र मोडती कलाकुसरी।
परि अवघे ते धटिंंगण॥
(6.8.11- दासबोध)
या उक्तीतून साक्षात् समर्थ रामदास स्वामीनींच नमन-खेळ्यातील स्त्री भूमिकेचे कौतूक केले आहे. समर्थ म्हणतात, खेळांमध्ये सर्वात चांगली कला दशावतारी कलाकार सादर करतात. त्या कलाप्रकारात आकर्षक नट्टापट्टा केलेल्या सुंदर सुंदर पोरी डोळे मिचकावित येतात, पण त्यांना भुलू नका कारण ते एकप्रकारचे फसवे धटिंगण आहेत. अर्थात त्यातील तरूणी या खर्‍या नसून कलाकुसर केलेले पुरूषच आहेत. या समर्थांच्या दाखल्यावरून नमन-खेळ्यांची लोकप्रियता फार अगदी शिवपूर्वकाळापासून जनमानसावर आहे, हे स्पष्ठ होते.
नमनात संकासूर, गणपती, नटवा अशी काही मानाची सोंगे असतात. ती नाचवून झाली की, गौळणीला सुरूवात होते.


‘घेतले दह्यादुधाचे माठ
आणि चालले मथुरेच्या बाजाराला..’ अशी आरोळी देत मथुरेच्या बाजाराला निघालेल्या गौळणी आणि त्यांची वाट अडविणारे कृष्णाचे सुदाम-पेंद्या हे सवंगडी खर्‍या अर्थाने नमनात रंग भरतात. पूर्वी नमनातील गौळणी भडक रंगाच्या, जरीकाठाच्या साड्या नेसत. याशिवाय अंगात चोळी,चोळीत करवंट्या, डोक्यावर गंगावण (केसटोप), भरगच्च गजरे, कानात, नाकात, गळ्यात वेगवेगळे अलंकार, शिवाय डोक्यावर बिंदी, कबंरपट्टा, पायात चाळ, बांगड्या आदि आभुषणांनी सजलेले तरूण म्हणजेच नमनातील ‘गौळण’. मेकअप् तर इतका बेमालूम केलेला असतो की हा बाप्या आहे हे सांगूनही पटणार नाही. गवळणींची गाणी मात्र आता बदलली आहेत. पूर्वी मृंदुग आणि टाळ यावरच गौळण नाचायची, आता तसे नाही. आता गौळण अधिक आकर्षक करण्यासाठी कमीतकमी चार ढोलक्या लागतात. याशिवाय टाळ, कॅसियो, प्रकाशझोत झोडणारी लायटिंग, स्पष्ठ आणि आवाजाचा उठाव दर्शवणारी ध्वनी व्यवस्था आणि उडत्या चालीची गाणी....
पहाटेच्या प्रहराला
सुर्य उगवूनी आला
चला चला सखियानो
जावूया बाजाराला..

असे गाणे लागले की, 16 सहस्त्र 108  गौळणींचे प्रतिनिधीत्व करणार्‍या किमान 7/8 गौळणी डोक्यावर माठ घेवून एकापाठोपाठ एक नाचत येतात. आडवे-उभे, तिरके, चवड्यांवर नाचणे, हाताच्या स्टाईल, कमरेची लचक, छातीचे हेलकावे, मुरडणे, ठेका धरून नाचणे या स्त्रीयांच्या हालचाली हे पुरूष बेमालूूम वठवत असतात. अर्थात त्यासाठी महिनोंमहिने मेहनत घेतलेली असते.
सार्‍या गौळणी मथुरेच्या बाजाराला जात असतानाच राधा वाटाड्या म्हणून मावशीला हाक मारते. मावशी साधारणत: साठी ओलांडलेली रंगवलेली असते. पण तीच्या वाकड्म- तिकड्म नाचण्याचा जोश गौळणींना लाजविणारा आणि नमनात धम्माल उडविणारा असतो. येथेच मावशी टाळ्या घेते. त्यानंतर संवाद रंगतो.
राधा: अगं काय करत होतीस इतका वेळ
मावशी: अगं नवर्‍याला दुध पाजत होते.
गौळणी: काय म्हणलीस?
मावशी: अगं माझा नवरा लय आजारी, तवा मी फाटं फाटं उठले. गोठ्यात गेले. गाईचं दुध काडलं. ते गरम केलं. आणि नवर्‍याला गाईचं दुध पाजलं आणि आले बग धावत-पळत..
मावशींच्या शंकानिरसनाने मात्र सार्‍यांचा हसून हसून जीव जातो. मग मावशी सार्‍यांना बाजाराचा थाट विचारते.  तेव्हा मावशी म्हणते, 
मावशी: घेतली कोथिंबीरीची जुडी अन् नेसले नववारी साडी.. सोबत घेतला चटणीचा गोळा.
राधा: तो गं कशासाठी?
मावशी: अगं हल्लीची पोरं लय वात्रट झाली आहेत. दिसली पोरगी की पाठीशी लागतात, त्यांच्या डोळ्यात टाकला चटणीचा गोळा की चालले बाजाराला..
मावशी आणि गौळणी यांचे असे मजेदार संवाद चालले असतानाच, डोक्यावर मोरपीस, कंबरपट्टा, पितांबर नेसलेला आणि बासरी वाजवणारा बाळकृष्ण गाण्याच्या तालावर बेधुंद नाचत येतो. कृष्ण गौळणींना बाजारात जाण्यापासून रोखण्याची जबाबदारी सवंगडी सुदाम-पेंद्यावर सोपवतो. यावेळी सुदाम, पेंद्या येतात. ते गौळणींची चेष्टा करत त्यांची वाट अडवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या संवादातून नमनात अधिकच रंग भरत जातो.



पेंद्या: अले सुदामा तू मला कशाला लोलवलंस?
सुदामा: अरे लोलवलं नाय रे बोलावलं.
असे हे विनोद नमनात धम्माल उडवून देतात. वाट अडवल्यावर राधा पेंद्या सुदामाला ‘कायदा’ विचारते. तेव्हा बोबडा पेंद्या बावरतो.
पेंदया: अले सुदामा, राधाबाय कांदा विचारते. आता 100 रू. किलोचा कांदा खयसून आणून देयाचा रे हिला..?
सुदामा: अरे ती कांदा नाय विचारत, ती कायदा म्हणजे कृष्णदेवाचा कायदा विचारते.
मग सुदाम-पेंद्या गौळणींना कायदा गाण्यातून सांगतात. त्या कायद्यानुसार सार्‍या गौळणी खाली बसतात. हल्ली नमनामध्ये मावशीला नाव घेण्यास लावले जाते. त्यावर बक्षिसही लावले जाते. मग मावशी नाव घेते.
‘बगता काय सुदाम- पेंद्या
बगता काय सुदाम-पेंद्या
चला हवा येवू द्या..’
किंवा


‘आजपण उद्यापण परवापण
सुदाम-पेंद्या तुमच्यासाठी कायपण’
कामगिरी यशस्वी केलेले हे विजयी वीर शेवटी कृष्णाचा धावा करतात. देव त्यांना विचारतो, कामगिरीचं काय झालं?
सुदामा: रूपयाचे सतरा आणे करून ठेवलेले आहे.
कृष्ण: रूपयाचे सतरा आणे कधी होतात काय?
सुदामा: देवा सार्‍या गौळणींना दगडाचे दोर काडून बांधून ठेवलंव हाय.
कृष्ण: दगडाचे दोर कधी येतात काय?
सुदामा: देवा काय सांगू तूला, अरे श्रावणात धो धो पाउस पडतो. तवा जमिनीतनं कोंबरी (पालवी) वर येते. त्याचे येल (वेल) निघतात. ते दगडांच्या आधाराने मोठे होतात. त्यालाच देवा दगडाचे दोर म्हणतात.
सुदामाचे हे चातुर्यपुर्वक उत्तर ऐकून देव खुश होतात व त्यांना रजा देतात. मग कृष्णच गौळणींचा समाचार घेतो. गौळणी कृष्णाला ओळख विचारतात. तीपटवून घेण्यासाठी कृष्ण आपली अवतारलीला सांगतो.

‘ऐकून घे लक्ष दे..माझी जन्मकहाणी
उभा मी श्रीहरी.. तुझ्या वाटेवरी
राधे पहिला अवतार हा..
मत्स्य मी धरीला
अवतार मत्स्य धरूनी संकासूर वधिला..’
असे दहा अवतार कृष्ण सांगतो. गौळणींना कृष्णाचे अवतार कार्य पटते. मग त्या कृष्णाबरोबर रासलीला खेळतात. यावेळी 
विनविते तुला रे कान्हा
वाट सोड ना..
जावू दे रे  घरी
जावू दे रे घरी वाट सोडना.. 
अशा गाण्यात रासलीला रंगते.
यानंतर गौळण संपते, पण गौळणींचाच एक भाग असलेले ‘कंस वध’ हे नाट्य सुरू होते. यावेळी आक्राळविक्राळ गर्जना करत कंस महाराज दरबारात येतात. हवालदारांची बहरदार बतावणी येथे रंगते. कंस महाराज अक्रुराला बोलावून कृष्णाला मथुरेत आणावयास सांगतात. तेव्हा अक्रुर घोड्यावरून कृष्णाला घेवून येतो. अखेर कृष्ण आणि कंसाचे तुफान युध्द होते, आणि कंसाचा वध होतो.


अशाप्रकारे नमनातील केवळ गौळण हा भाग संपतो. यानंतर पुन्हा मानाची सोंग, फार्स, वगनाट्य आणि पुन्हा शेवटाचे आणि नमनाचे खास आकर्षण असलेला आणि नमनात ज्याला मानाचे नमन आहे तो ‘दशमुखी रावण’ ढोलताशांच्या गजरात येतो. त्यानंतर आरती होवून नमनाची सांगता होते.


अमोल पालये, रत्नागिरी.
मो.9011212984. 


Comments

  1. खूप सुंदर व यथार्थ विश्लेषण ! हा लेख एक ऐतिहासिक ठेवा ठरेल.‌ खूप खूप शुभेच्छा....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

एक तप.. विद्यार्थी गुणगौरवाचे!

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू