पहिली माळ: गलबतवाल्यांची सुकाय

पहिली माळ: गलबतवाल्यांची सुकाय



अर्थात सुंकाई देवीची जन्मकथा

रत्नागिरी शहरापासून 11 किमी.दूर आरे-वारे मार्गावर असलेल्या सडये-पिरंदवणे-वाडाजूनची ग्रामदेवता श्री सुंकाई मंदिराविषयी उद्धबोधक माहिती भक्तगण-वाचकांसाठी देत आहे.
- अमोल पालये, रत्नागिरी.

रत्नागिरी जिल्ह्याला विशाल समुद्र लाभला आहे, यामुळेच इथे प्राचीन काळापासून जलवाहतूकीला अनन्यसाधारण महत्व आहे. शिवकाळात जलवाहतुकीचा वापर व्यापार-उदिमासाठी वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला, आणि मोठमोठ्या व्यापार-वसाहती उदयाला आल्या. शिवकाळात कोकणात ‘गलबत वाहतूक’ व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारला.


गलबत म्हणजे काय?
शिवकालीन गलबत म्हणजे शिडांचे मोठे जहाज. ज्याची साहित्य वाहून नेण्याची क्षमता 70 टन होती. त्याला वल्हवण्यसाठी 20 नाविक लागत. इतकी मोठी गलबते रत्नागिरी तालुक्यातील समुद्रकिनारची गावे आणि त्यांना लागून असलेल्या खाड्या येथपर्यंत प्रवास करत आणि मालाची ने-आण करत. ही वाहतूक रत्नागिरी किनारपट्टीवरुन गुहागर-दाभोळ खाडी, दापोली-हर्णे बंदर, मंडणगड-बाणकोट खाडी अशी वाहतूक चालत असे.
गलबताचा व्यवसाय करणारा वर्ग हा खारवी-आगरी-कोळी. हा समाज कायम समुद्रावर स्वार झालेला. देवाच्या हवाल्यावर रोजी-रोटी चालू. त्यामुळे वारा-वादळ-अजस्त्र समुद्राच्या बेभान लाटांमध्ये देवाचाच काय तो आधार! त्यामुळे क्षणाक्षणाला देवावरची श्रद्दा व्यक्त होत आलेली. ङ्ग
रत्नागिरी शहराला लाभलेल्या अरबी समुद्राची किनारपट्टी मिर्या, काळबादेवी अशी थेट आरे-वारे गावावरुन नेवरेमार्गे गणपतीपुळ्याला वळते. हा समुद्रमार्ग ज्या गावात थेट घुसत नाही, तिथं नद्यांमार्गे खाडी निर्माण करतो. उदा.साखरतर-आडी, मजगाव या मोठ्या खाड्या. यातील ‘आरे खाडीचे एक टोक सडये आणि धामेळे (कोतवडे) गावाचे दोन भाग करुन पुढे सरकते. पुन्हा त्या खाडीच्या एका टोकाची दोन टोके होतात. त्यापैकी एक कोतवडे बाजारपेठमार्गे वळते, तर दुसरे टोक सडयेमार्गे पिरंदवण्याला मिळते. मोठ्या प्रमाणातील भुस्खलनामुळे आज या खाड्यांचे पुरते नामोनिशाण मिटले आहे. गाळाने सार्‍या खाड्या गच्च भरल्या आणि संपल्या. रस्ते वाहतूक आली, आणि जलवाहतूकीचे महत्व कमी झाले. प्राचीनकाळी आरेमार्गे कोतवड्याला जाणारे खाडीचे एक टोक हे कोतवडे (सनगरेवाडी) पर्यंत विस्तारलेले होते. तर दुसरे टोक हे आज ज्याठिकाणी श्री सुंकाई मंदिर आहे. त्यापलिकडे विस्तारले होते. या खाड्यांच्या टोकापर्यंत त्याकाळी गलबत व्यवसाय चालत असे, अर्थात आज ज्याठिकाणी सुंकाई मंदिर आहे, त्याठिकाणपर्यंत नित्यनियमाने मोठमोठ्या शिडाची जहाजे येत असत. तिकडून आलेल्या मालाची इथे उतरण होत असे, तर इथून दुसरीकडे जाणार्‍या मालाची चढण इथून होत असे. या मालात मंगलोरी कवले, सुकी मासळी, नारळ-सुपारी, भात, मौल्यवान लाकुड उदा. खैर अशी वाहतूक सडये-पिरंदवणेपर्यंत होत असे. जलप्रवास हा अत्यंत धोकादायक, किचकट, दिर्घकाळ चालत राहणारा आणि अडीअडचणींचा. कधी गलबतं बुडायची. कधी फुटायची. कधी रुतायची. कधी अडायची. 
एकदा काय झालं. एक जहाज माल घेऊन समुद्रमार्गे आरे खाडीने पिरंदवणेतील आजच्या सुंकाई मंदिरपरिसरात मालाची उतरण करण्यासाठी थांबले. मालाची उतरण-चढण, मग नाविकाचं जेवण-खाणं. विश्रांती या काळात लागलेल्या ओहोटीत गलबत गाळात रुतलं. खूप प्रयत्न केले, ते निघेचना. तांडेल-खलाशी हैराण झाले. गाळ  उपसायला सुरुवात झाली. भरती आली, तरीही गलबत हलेना. माणसाचे जेव्हा सारे प्रयत्न संपतात, तेव्हा श्रध्देचा जन्म होतो. इथे तेच झाले.
त्या खाडीच्या तुडुंब पाण्यात सार्या नाविकांनी आपल्या ग्रामदेवतेला साकडे घातले, आणि ‘एक जोर...हैय्या’ केले. त्यासरशी गलबत घसरल्यासारखे झाले. ते कशामुळे आणि कशावरुन घसरले म्हणून एका खलाशाने तळात उडी मारली, तर त्याच्या हाताला एक गोळाकार ‘तांदळा’ मिळाला. तो खलाशी आश्चर्यचकित झाला, आणि आपल्या ग्रामदेवतेच नाव घेत पाण्याबाहेर आला. अखेर जहाजही गाळातून मोकळे झाले, आणि खलाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
ज्या पाषाणामुळे हे घडले, तो पाषाणमय तांदळा त्या गलबतवाल्यांनी तेथेच स्थापिला आणि नाव दिले ’’सुकाय’! सुकायचा मुळ शब्द सुखाय. सुख देणारी आई ती सुखाई. या सुखाईचा बोलीभाषेत ’सुकाई’ असा अपभ्रंश झाला. पुढे त्यांचे प्रमाण मराठीकरण होऊन ’सुंकाई’ असे झाले.


....आता हे ‘सुंकाई’ च नाव का? 
याविषयी अभ्यासक या नात्याने काही ठोकताळे समोर येतात. रत्नागिरी तालुक्यात अन्यत्र कुठेही सुंकाई नावाची देवी नाही. आणि मंदिरही नाही. पण गुहागर तालुक्यात सुंकाईची एक नव्हे दोन मंदिरे आहेत. ही मंदिरे गुहागर समुद्र किनारपट्टीलाच आहेत. यातील एक हेदवीच्या प्रसिध्द गणपती मंदिराजवळच आहे. बारा वाड्यांची ग्रामदेवता असलेल्या सुंकाईचा मोठा शिमगोत्सव साजरा होतो, आणि सुंकाई पालखीत बसून मोठया डौलात ग्रामप्रदक्षिणेला निघते. 
पिरंदवणे येथे रुतलेल्या त्या गलबतातील नाविक अर्थात खलाशी, तांडेल हे याच गुहागर प्रांतातील असण्याची शक्यता अभ्यासक वर्तवत आहेत. ज्यायोगे गलबत अडल्यामुळे त्यांना ग्रामदेवतेची अर्थात सुंकाईची आठवण झाली, आणि सापडलेल्या तांदळ्याला सुकाय असे नाव दिले, आणि पुढेही या निराकार तांदळ्याला सुकाय हेच नाव कायम राहिले असावे.
काळांतराने हीच सुंकाई सडये-पिरंदवणे-वाडाजून वासियांची ग्रामदेवता म्हणून मान्यता पावली. सुंकाईचे स्थान सडये-पिरंदवणे-वाडाजून या तिन्ही गावांच्या बरोबर मध्यावर आहे.
श्री सुंकाई ही बसणीच्या महालक्ष्मीप्रमाणे मुर्तीस्वरूप नाही. ती तांदळा स्वरूप आहे. हा तांदळाही साळुंकेत बसविला आहे. त्यामुळे प्रथमदर्शनही पाहता ती मोठी शिवपिंडच भासते. मात्र ही साळुंका आसनस्वरूप आहे. तांदळा हीच मुख्य देवता आहे. महाराष्ट्रात तांदळा स्वरूपात अनेक देवीस्थानं आढळतात. त्यांचे तांदळा अर्थात निर्गुण-निराकार स्वरूपामुळे त्यांचा उगम कधीचा आहे, हे सांगणे तसे कठीणच. कोकणात भूमका आणि तांदळा स्वरूपात देवीची देवस्थाने आहेत. ती जितकी प्राचीन तितकीच जागृत मानली जातात. सुंकाई त्यापैकीच प्राचीन देवस्थान असावे.
सुंकाई नावात विशेष अर्थ नाही. त्याचा मुळ प्रमाण मराठी शब्द असा आहे. सुख देणारी आई ती सुखाई.. सामान्यत: बोलीभाषेत सुखाईचा अपभ्रंश होऊन कालौघात अंत्यत प्रमाण मराठीत ते ‘सुंकाई’ असे नामाभिमान झाले असण्याची शक्यता आहे.
सुंकाईचे विशेष म्हणजे तीच्या मागे बसलेले सारे तीचे सेनापती. हे सेनापती ‘भूतम्हारक्या’ म्हणून पुजले जातात. भूतम्हारक्या ही बहुजन समाजातील देवता आहे. त्यातील ‘म्हारक्या’ हा शब्द विशिष्ठ समाजदर्शक आहे. हे भूतम्हारक्याही तांदळा-पाषाण स्वरूपात आहेत. त्यांचे पुजाविधी सुंकाईप्रमाणेच श्रद्धेने केले जातात.
दुर्गम, आडरानातील देवतांचे सण-उत्सव फारच कमी असतात, सुंकाईबाबतही तेच घडते. हे देवीस्थान असूनही येथे नवरात्रीतील ‘उत्सव’ाची परंपरा नाही. याठिकाणी ‘एक्का’ हा नामगजर सोहळा साजरा केला जातो. मात्र तीही परंपरा फार अलिकडील आहे.
सुंकाई घराघरात एका कारणास्तव श्रध्देय आहे ते कारण म्हणजे सुंकाईची ‘राखण’. वस्तूत: शेतकरी-बहुजन समाजात सुंकाईच्या सेनापती गणांच्या संतुष्टीकरणासाठी, शेतीवाडीच्या, कुटुंबाच्या भल्यासाठी घरगुती राखण दिली जाते. ही राखण भूतम्हारक्या या सेनापती देवांना दिली जाते. तो बहुजन देव असल्याने त्याला आरवत्या कोंबड्याचा बळी दिला जातो. कोंबड्याच्या बळीची ही राखण देवळामागील स्थानावर दिली जाते. तर देवीपुढे नारळ फोडला जातो. ही राखण देण्यापुर्वीचा विधी अंत्यत महत्वाचा आहे. आणि या विधीमुळेच सुंकाईचं स्थान घराघरात अधिक घट्ट आणि श्रध्देय झालेलं आहे. तो विधी म्हणजे ‘पाषाणाद्वारे देवीची राखणेला मान्यता घेणे...’ 
राखण देण्याआधी ती देण्यार्‍याने (यजमान्याने) देवीला राखण देतोय ती मान्य आहे की नाही..? याची विचारणा करावी लागते. गुरव मंडळी ती पाषाण हलवून करत असतात. गुरवांचा देवीशी पाषाण हलवून संवाद होतो. हा संवाद जनसमान्यांना अत्यंत भावतो, साक्षात देवीच आपलं गार्हाणं ऐकतेय... ही संकल्पनाच सामान्य शेतकरी, गावकरी यांना भन्नाट वाटत असते. पाषाण हलविण्याच्या संवादात देवी बर्याचदा भक्तावर रागावलेलीच असते. गुरव यजमान्याच्यावतीने तीची समजूत घालतात, आणि राखण मान्य करण्यास राजी करतात. अर्थात देवी संवादातून मान्यता दर्शवते. आणि पाषाण ‘हलका’ येतो. पाषाण हलका येणे म्हणजे सारेकाही देवीने मान्य केले आहे, आर्शीवार्द दिला आहे, याचे सुतोवाच.. यानंतर राखणेचा विधी पार पडतो.
कुटुंबाची जशी राखण मृग नक्षत्रात पार पडते, तशीच राखण सडये-पिरंदवणे-वाडाजून या गावांची ‘गावकीची राखण’ शिमग्यात दिली जाते. तिचाही विधी साधारणत: वरिलप्रमाणेच असतो. मात्र या राखणेत देवीच्या गार्हाण्याचं स्वरूप हे गावाच्या कल्याणाचं.. रक्षणाचं असं व्यापक असतं. राखणेचे बळीविधी हे देवळाच्या बाहेरील स्थानावर होत असतात. 
सण-उत्सवाच्या गजबजाटात नसलेली ही देवी येथील गावकर्‍यांच्या मात्र अतीव श्रध्देदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला आहे.
सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त आज ही शब्दरूपी पहिली माळ सुंकाईला अर्पण करत आहे..चा भाग आहे, आणि म्हणूनच सडये-वाडाजून या दोन्ही गावच्या नमन मंडळांची नावे ही सुंकाईच्याच नावावरून ठेवण्यात आली आहेत. 

-अमोल पालये, सडये-पिरंंदवणे.

मो.9011212984.

Comments

  1. Very very good amol पालये तुझ्या आणि तिन्ही गावच्या वेशीवर बसलेली सुंकाई आई सर्व बालकांच्या व मुंबईकरांच्या सदैव पाठीशी राहो अशी देवीच्या चरणी प्रार्थना

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संकासूर (sankasur)

नाटकात काम करतानाच इच्छा मृत्यू येणारे नटवर्य ‘शंकर घाणेकर’ (shankar ghanekar)

कोनाड्यातील हरवलेल्या वस्तू